गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/41882026.cms

मंगला सामंत
गणपतीच्या जयजयकारात 'मोरया' हे संबोधन मोठ्या जोशात उच्चारलं जातं. पण मोरया
या संबोधनाचा नेमका अर्थ काय? त्यामागे प्राच‌ीन भारतीय मातृसंस्कृती कशी
दडलेली आहे, त्याचा वेध घेणारा लेख...

गणेश चतुर्थीला स्वागताला आणि अनंत चतुर्दशीला निरोप देताना, गणपतीला उद्देशून
आपण 'गणपतीबाप्पा मोरया' अशी हाक देत असतो. अशी हाक का दिली जाते? त्यामागचं
रहस्य काय? हे जाणून घेताना, भारताच्या प्राचीन मातृसंस्कृतीतील पुरावे, अवशेष
तपासावे लागतात. कारण गणपती म्हणजे 'गणाची प्रमुख' (पती) ही संकल्पना
मातृसंस्कृतीतून पुढे आलेली आहे. भारतातील प्राचीन-अतिप्राचीन संस्कृती ही
मातृप्रधान होती, हे आता सर्वमान्य झालेलं सत्य आहे.

अपत्यसंभवामध्ये पुरुषाचंही योगदान असतं, हे सत्य स्त्री-पुरुषास ठाऊक
नसण्याचा काळ हजारो वर्षांचा होता. तोपर्यंत मूल जन्माला घालणारी माता ही
आपोआपच टोळीबाबत निर्णय घेणारी, अन्नपदार्थ वाटून देणारी, औषधोपचार करणारी,
अरिष्टापासून वाचवणारी अशी प्रमुख मानली जात होती. संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे
वाटप करणे यावरून 'माता' असं संबोधन स्त्रीला आणि 'दोहन' म्हणजे दूध काढणे
यावरून 'दुहिता' हे संबोधन त्या मातेच्या कन्येला आहे. या वस्तुस्थितीतून पुढे
स्त्री-प्रधान टोळी-अवस्था उदयाला आली. या मातृप्रधान टोळ्या प्रथमार्धात जगात
सर्वत्र होत्या. परंतु त्या काळात भटक्या, शिकारी अवस्थेतील जंगली
पुरुष-टोळ्यासुद्धा जगात सर्वत्र होत्या. त्यांच्या हल्ल्यात जगातील अनेक
मातृटोळ्या प्राथमिक अवस्थेतच नष्ट झाल्या. भारतामध्ये मात्र मातृटोळ्यांचं
रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. त्याचे पुरावे आपले प्राचीन
वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातील अवशेष, मातृदेवतांचं पूजन, धार्मिक
रीती, परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून, आणि त्याचप्रमाणे आजच्या आदिवासीच्या
चालीरीतीतून, या मातृसंस्कृतीची पावलं स्पष्टपणे दिसतात.

जगातील सर्व मातृटोळ्यांचं प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे भाषा बोलता येत
नसल्यामुळे, आणि वस्त्राचा शोध लागला नसल्यामुळे टोळी सदस्यांना एकमेकांना
ओळखता येण्यासाठी, विविध पशु, पक्षी, वनस्पती यांच्या खुणांनी, म्हणजे त्यांची
पिसे, शिंगे, शेपट्या, मुखवटे अशी चिन्हे धारण करून वावरणे, हा एकमेव पर्याय
होता. भारतीय संस्कृतीत मत्स्य, कच्छ, वराह, वृषभ, महिष, नाग, मोर, गरुड, हंस,
जटायू, वानर वगैरे नावांनी अशा मातृगण-जमातींचे उल्लेख सापडतात. रामायण
काळातील जटायू किंवा वानर यासुद्धा त्या प्राण्यांचे मुखवटे धारण करणाऱ्या
जमाती होत्या. मातृटोळ्यांना पशु-पक्ष्यांच्या ह्या चिन्हामुळे एकसंधता आली.
त्यांची सुरक्षितता वाढली. त्यांच्या एकत्र राहण्याला अर्थपूर्णता आली. हळूहळू
या चिन्हांवरून मातृटोळ्या ओळखल्या जाऊ लागल्या. अखेरीस ती त्यांची कुलचिन्हे
होऊन गेली. पुढे भाषा विकसित होण्यात अनेक शतके गेली. तोपर्यंत कुलचिन्हांवरील
विश्वास टोळ्यांच्या श्रद्धेमध्ये बदलला. भाषेच्या विकासात मातेला संबोधन आले.
तसे दितीवरून दैत्यगण, दनुमातेचे दानव, अदितीचे आदित्य, कपिलेचे कपिलेय अशी
संबोधनं मातृगणांना आली, तरी कुलचिन्हांवरील श्रद्धा, त्यांची गणातील
प्रतिष्ठापना, पूजन यामध्ये बदल झाला नाही. टोळ्यांमधील चांगल्या घटना,
दुर्घटना किंवा युद्धसंघर्षाचे प्रसंग, विजय मिरवणुका यामध्ये आपापली
कुलचिन्हं मिरवत न्यायची परंपरा गण-जीवनातही तशीच टिकून होती, कारण त्याशिवाय
त्या गणाचा सहभाग समजता येत नसे. आजच्या काळात परिषदेसाठी येणारे
राष्ट्रप्रमुख जसे त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात असतात, किंवा क्रीडा
स्पर्धेसाठी राष्ट्रं आपापला ध्वज मिरवत आणतात, तेच काम ही कुलचिन्हं करीत
होती. काही ठिकाणी कुलचिन्हांचा उल्लेख 'वाहन' असाही आहे. याबाबत संशोधक असं
मानतात की, जेव्हा दोन मातृगणांमध्ये संघर्ष होत असे, तेव्हा ज्या गणाचा पराभव
होई, त्याचं कुलचिन्ह हे विजेत्या गणाचं वाहन (मांडलिक) म्हटलं जात असे.
विजेत्या गणाची प्रमुख (पती) माता ही पराभूत गणाचे चिन्ह वाहनासारखे मिरवत आणि
दौडत विजयी सभेमध्ये येत असे. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी काही निरीक्षणं
मांडतात. महाराष्ट्र क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिसरात प्राचीन काळात जो संघर्ष
झाला, त्यामध्ये, मातंग (हत्ती) गणाने मूषक (उंदीर) गणाचा पराभव करून मूषकांना
जंगलपट्टीबाहेर हाकललं. या विजयानंतर मातंग गणाची गणपती-माता हत्तीचा मुख‍वटा
लावून, मुषकाला वाहन बनवून मिरवणुकीने आली. दोन गणांमधील हा संघर्ष दीर्घकाळ
आणि तीव्रपणे झालेला दिसतो. म्हणून पुढेही या विजयाची आठवण घरोघरी गणपती मूषक
वाहनासह वाजत-गाजत आणून चालू ठेवली गेली. साधारणपणे, इ.स.पूर्व सुमारे २ ते ३
हजार वर्षांपर्यंत लोखंडी नांगराचा शोध लागण्यापूर्वी, मातांनी 'गणपती' बनून
आणि वाहन घेऊन मिरवणुकीने निघावे, अशी प्रथा चालू होती. दुर्गेने महिषासुराचा
पराभव केला, म्हणून ती महिष वाहनावरून येते, हे आपल्याला माहीत आहेच.
त्याचबरोबर, वैष्णवी गरुडावरून येते, माहेश्वरी बैलावरून येते वगैरे उल्लेख
भारतीय संस्कृतीत फक्त स्त्रियांबाबत सापडतात.

नांगराच्या शोधानंतर मात्र शेती उद्योगात जी मोठी क्रांती आली, त्यामध्ये शेती
जी विळ्या-कोयत्याने स्त्रियांकडून होत होती, ती पुरुषाहाती गेली. फळे, भाजी,
कंदमुळांऐवजी अमाप धान्य पिकू लागलं. जमीनदारी उदयास येऊन, पुरुष जमिनीचा व
धान्य उत्पादनाचा मालक झाल्यामुळे, स्त्री-वारसाऐवजी पुरुष-वारसाचा प्रश्न
ऐरणीवर आला. आणि इथेच विवाह प्रथेचा चंचुप्रवेश झाला. मातेकडून मुलीकडे जाणारा
वारसा हक्क आणि त्याकरिता विवाहाची नसणारी गरज, हाच संस्कार शेकडो शतके रूढ
होता. पितृसंस्कृतीचे समर्थक जमीनदार आणि राज्यकर्ते यांना हा संस्कार पुसून
टाकण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले. त्यातून देव-दानव संग्राम, रामायण आणि
महाभारत हे मोठे संघर्ष, मजबूत मातृसंस्कृती उखडण्यासाठी, भारतीय उपखंडात होऊन
गेले. मातृसंस्कृतीतील अवैवाहिक स्त्री-पुरुष संबंध पद्धतीची,
जमीनदार-राज्यकर्त्यांनी मोठीच धास्ती घेतलेली होती. ज्या रीतींमुळे त्यांचं
पितृत्व धोक्यात येत होतं, त्या रीतींचा नायनाट करायला हवा, हे त्यांनी ताडलं.
त्यामुळे 'स्त्री-पुरुष मुक्त संबंध हे नैतिक नाहीत' हा नवा संस्कार रूढ
करण्यासाठी या आक्रमकांनी भारतात हजारो वर्षे स्थिर असलेल्या मातृसंस्कृतीवर
धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी हल्ले करण्याचे
राजकारण-धोरण जन्माला घातले. उदा. तत्कालीन राज्यांच्या स्त्री-शासकांना
राक्षसिणी रंगवून त्यांचा संहार करण्यास सुरुवात केली. मातृपरंपरेप्रमाणे,
कुणा स्त्रीने पुरुषाला शरीरसंबंधासाठी विचारण्याचे धाडस केल्यास, तिचे
नाक-कान कापून विटंबनेचे उदाहरण शूर्पणखेद्वारे निर्माण केले गेले. आणि
स्त्रीच्या या पारंपरिक स्वातंत्र्यावर दहशत बसविण्यात आली. शिवाय स्त्रीच्या
चारित्र्याचं महत्त्व वाढविण्यासाठी अहिल्या, रेणुकासारख्या मातृगणातील
मातांच्या चारित्र्याबाबत संशयावरून छळाच्या कथा रंगविण्यात आल्या, आणि
त्यांना कशा शिक्षा होऊ शकतात, त्याची उदाहरणं मातृगणासमोर ठेवण्यात आली.
मातृगणातील माता गावोगावी व्यापारासाठी कुळातील उत्पादनं घेऊन किंवा
औषधोपचारासाठी जात असत. त्यांना अनेकदा रात्रीचा तिथे मुक्काम करावा लागे.
म्हणून त्यांना 'कुलस्था' (कुळात राहणारी) म्हटलं जाई. पण पितृसंस्कृतीच्या
समर्थकांनी त्याचं 'कुलटा' असं संबोधन करून, वाईट चालीची या अर्थाने
स्त्रियांच्या या मुक्त संचारावर, त्यांचे बाहेर शरीरसंबंध होतील या भीतीने
बंदी आणली. तरीही काही मातृगणांनी अशा आक्रमणांना न जुमानता, आपल्या परंपरा
चालवीत आणि मुक्त शरीरसंबंधांना प्रमाण मानीत, आपले व्यवहार चालू ठेवलेले
होते. मग त्यांच्या कुळात होणाऱ्या उत्पादनावर सामाजिक बहिष्काराचं शस्त्र
राज्यकर्त्यांनी उपसलं आणि या मातृगणांच्या चरितार्थाची कोंडी केली. अखेर
शरीरसंबंधासाठी येणाऱ्या पुरुषाच्या मदतीच्या मेहेरबानीवर जगण्याशिवाय या
मातृगणांना उपजीविकेचा दुसरा मार्ग राहिला नाही. त्यातून वेश्याव्यवसाय समाजात
उगवला. स्त्री-पुरुष संबंधांवर तत्कालीन स्त्रियांचा स्वतःचा असणारा अधिकार
खच्ची करणं, हा एकूण या संघर्षाचा केंद्रबिंदू होता.

मातृसमाजावरील त्यांच्या संस्कृतीचे सर्व ठसे पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून
पटकीवर औषधोपचार करणाऱ्या मरीआईसारख्या परोपकारी मातृदेवतांची मंदिरं
गावाबाहेर टाकली गेली, आणि त्याऐवजी राम-सीता, विठ्ठल-रखुमाई, विष्णू-लक्ष्मी
अशी विवाह ठसवणारी जोडपेयुक्त मंदिरं बांधली गेली. गणांना मातांवरून असणारी
नावं बदलून मरुत गण, देवगण, असुरगण, रुद्रगण, शिवगण, ब्रह्मगण अशी पुरुषांवरून
नावं आणली गेली. त्याचं पुढील पाऊल म्हणजे, स्त्रीऐवजी आता पुरुष हा गणप्रमुख
आहे, हे ठसविण्यासाठी, गणपती-स्त्री आपल्या वाहनावर बसून येण्याची जी परंपरा
आहे, तिथे पुरुष-गणपती आणून, ती मोडण्याचा प्रयत्न आक्रमकांनी केला आणि आपल्या
आजच्या गणपतीबाप्पाचा जन्म झाला.

मातृगणांमध्ये, संशोधन-अभ्यास करणारा, तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान, अवगत
असणारा विद्वान स्त्रियांचा एक गट प्राचीन काळापासूनच कार्यरत होता. हा गण
सरस्वतीमातेवरून ओळखला जात होता. सरस्वती ही विद्येची देवता आणि 'मोर' हे
तिच्या गणाचं कुलचिन्ह होतं. वटपौर्णिमा कथेतील सावित्री ही याच गणाची सदस्य
होती, जिने वैद्यकीय क्षेत्रात बरंच संशोधन करून वनस्पती औषधांचा शोध लावलेला
होता. नांगरतंत्रानंतर आलेली विवाहप्रथा आणि ती रुजविण्यासाठी प्राचीन
मातृसंस्कृतीचा इतिहास व परंपरा नष्ट करण्याची आक्रमकांची सुरू झालेली
कारस्थानं यावर या बुद्धिवादी स्त्रियांचं बारीक लक्ष होतं. गणपती
मिरवणुकीतल्या स्त्री-गणपतीला डावलून जो पुरुष-गणपती पुढे आणला गेला, तो गणपती
स्वीकारण्यास मातंग-मूषक संघर्षाच्या प्राचीन इतिहासाची अडचण राज्यकर्त्यांना
होत होती. म्हणून गणपतीला पार्वतीने मळापासून बनवला, पुढे शंकराने त्याचं डोकं
उडवून हत्तीचं शीर लावलं वगैरे कथांच्या अंधश्रद्धेचा मुलामा देऊन मातांच्या
शौर्याच्या इतिहासाची आठवण अक्षरशः गाडून टाकली गेली. पुढे विवाह प्रथा पक्की
रुजविण्यास अविवाहित स्त्रियांसाठी चतुराईने आणलेलं हरतालिका व्रत, गौरीला
मिरवणुकीने आणून फक्त पुत्राच्या मातेचं महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न या सर्व
घटना मातृसंस्कृती लयाला जाण्याच्या धोक्याच्या घंटा होत्या. हे या विद्वान
स्त्रियांनी ओळखले. विवाहाचे मूळ रुजविण्याच्या प्रयत्नातून स्त्री-कुळं
उध्वस्त होत आहेत, आपली मातृमंदिरे उखडली गेली आहेत, मातृदेवतांना गावाबाहेरचा
रस्ता दाखवून आपल्या श्रद्धेचा अवमान केला गेलेला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या
अवैवाहिक पण सन्माननीय शरीरसंबंधांना वेश्याव्यवसाय बनवून विकृत केलेलं आहे,
हे या स्त्रियांच्या लक्षात आलं. नांगरापूर्वी विळ्या-कोयत्यांनी स्त्रिया
कंद-फळं-भाज्या असं पीक जोपर्यंत घेत होत्या, तोपर्यंत शेती व्यवसाय, हा
स्त्रियांचा व्यवसाय होता. तेव्हा आपलं सुवर्णयुग होतं, माता सन्मानाच्या
शिखरावर होत्या, हे या विद्वान स्त्रिया विसरू शकत नव्हत्या. पण
पितृसंस्कृतीच्या झंझावातापुढे आणि आक्रमणाला बळी पडून जसजसे मातृगण स्वतःला
बहिष्कारापासून वाचविण्यासाठी विवाह प्रथा स्वीकारून पितृगणात दाखल होऊ लागले
तेव्हा, या सरस्वती गणाच्या सदस्यांना आपल्या मातृसंस्कृतीचा शेवट डो‍ळ्यासमोर
दिसू लागला. प्रसंगा‍वधान राखून या गणाच्या बुद्धिमान सदस्यांनी गणेश
चतुर्थीला जोडून येणाऱ्या शेतीकाळातील भाद्रपद पंचमीला, 'कृषिपंचमी' हे संबोधन
देऊन, त्या दिवशी ज्या नांगर तंत्रामुळे आपल्यावर ही स्थिती आली, त्या
नांगराने नांगरलेलं धान्य स्त्रियांनी वर्ज्य करावं आणि त्या दिवशी फक्त भाजी,
कंदमुळं, फळं खाऊन, आपल्या इतिहासाचं स्मरण करावं, असं व्रत निर्माण केलं.
महाराष्ट्रातील पश्चिम भूभागात जिथे मातंग-मूषक संघर्ष झाला, तिथे कोकणपट्टी
धरून कृषिपंचमीचं हे व्रत 'ऋषीपंचमी' या अपभ्रंशाने स्त्रिया आजही करतात. त्या
दिवशी विळ्या-कोयत्याची पूजा करून स्त्रिया फळं, भाज्यांचं सेवन करतात.
तांदूळ, गव्हाचं वा अन्य धान्यांचं सेवन त्या दिवशी केलं जात नाही.

सरस्वती गणाच्या माता, एवढ्यावरच थांबलेल्या दिसत नाहीत, तर ज्या गणपती
मिरवणुकीत अन्य मातृगण आपापली चिन्हे घेऊन दाखल होत होते, त्या गणपतीमागील,
मातंग-मूषक संघर्षाचा इतिहास गणपतीच्या जन्माच्या अशास्त्रीय कथेद्वारे विपरित
केला गेला, त्याचा निषेध म्हणून, या मिरवणुकीवर सरस्वती गणाने बहिष्कार
टाकलेला दिसतो. त्यामुळे इतर कुलचिन्हांबरोबर या मिरवणुकीत असणारं त्यांचं
चिन्ह 'मोर' हे त्या मिरवणुकीतून बाहेर पडलं ते कायमचंच. सरस्वती गणातील
मातांबरोबर चर्चा करणाऱ्या पितृगणातील विद्वान पुरुषांना याचा धक्का बसला.
गणपती मिरवणुकीत 'मोर' या चिन्हाची उपस्थिती नसणं, हे या मिरवणुकीला येणाऱ्या
मातृगणांनासुद्धा दुःखदायक होतं. म्हणूनच गणपतीबरोबर मोराचा (सरस्वती गणाचा)
सुद्धा सन्मान आमच्या मनात आहे, हे दर्शविण्यासाठी मिरवणुकीतून आर्त साद घातली
जाऊ लागली. 'गणपतीबाप्पा, (आणि) मोर या'.


-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: [email protected]
           [email protected]

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2S-ObnOyVkbuXSTDixV55QeSCGmk3U0LsvZriApMukpyw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to